भारत भेटीवर आलेल्या जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्यापारविषयक परिषदेला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नासकॉमच्या कार्यक्रमाला मोदी आणि मर्केल उपस्थित होत्या, मात्र सिद्धरामय्या यांना निमंत्रितच करण्यात आले नाही. मोदी नेहमीच संघराज्यीय सहकार्याबद्दल बोलत असतात, मात्र सहकार्याची हीच त्यांची कल्पना आहे का, असा सवाल दिग्विजयसिंह यांनी केला आहे. हाच कार्यक्रम गुजरातेत झाला असता तर मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नसते का, असेही ते म्हणाले.