कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास केंद्र सरकारकडून सुरूवात झाली आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शनिवारपासून खोऱ्यातील १७ टेलिफोन एक्स्चेंजमधील दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली असून शनिवार संध्याकाळपर्यंत येथे २३ हजार लँडलाइन कार्यान्वित झाले.  तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. कमी इंटरनेट स्पीडने अर्थात 2जी स्पीडने येथे इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु पूँछ, राजौरी, किश्तवार, दोडा, रामबन या जिल्ह्य़ांत इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे. तब्बल १२ दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि सरकारी कार्यालये सोमवारपासून उघडणार आहेत. राजकीय नेत्यांच्या सुटकेचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, असे सरकारी प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पाच ऑगस्टपासून गेले १२ दिवस राज्यातील जनजीवन बंदिस्त झाले होते. तेथील र्निबधांना सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषद घेतली होती. दहशतवादी संघटनांनी काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला गेला. गेल्या १२ दिवसांत हिंसाचाराची वा जीवितहानीची एकही मोठी घटना घडलेली नाही. राज्याच्या १२ जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत असून केवळ पाच जिल्ह्य़ांत रात्री किमान निर्बंध असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

शुक्रवारचा नमाजही ठिकठिकाणी शांततेत झाला. तसेच सरकारी कार्यालयांतही उपस्थिती लक्षणीय होती. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोक जितका पुढाकार घेतील तितके निर्बंध शिथिल होतील, अशी माहिती त्यांनी दिली होती. अतिरेक्यांना संपर्काचा लाभ घेता येऊ नये म्हणून मोबाइलसेवा पूर्ण बंद ठेवली गेली आहे. पण काही दिवसांत ती पूर्ववत होईल. दूरध्वनीसेवा मात्र शुक्रवार रात्रीपासूनच विभागवार पूर्ववत होत असून शनिवारी श्रीनगरमधील दूरध्वनी सुरू होतील, असेही सुब्रमण्यम म्हणाले होते. दरम्यान, खासगी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू झाली असून काही दिवसांत सार्वजनिक वाहतूकही पूर्ववत केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हज यात्रेकरूंना कोणताही अटकाव कुठेही केला जात नसून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठाही सुरळीत आहे.