बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे.

या बैठीकीतून बाहेर पडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यमांना व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत, स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे दर्शवले.

राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत भाजपा व लोक जनशक्ती पार्टीचे भक्कम युती आहे. राजकीय स्तरावर व विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जनता दल यूनायटेडशी वैचारिक मतभेद असल्याने बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोक जनशक्ती पार्टीकडून सांगण्यात आले आहे.

याचबरोबर निकालानंतर लोक जनशक्ती पार्टीचे विजयी झालेले आमदार पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मार्गाबरोबर राहून भाजपा-लोजपा सरकार बनवतील. असं देखील लोक जनशक्ती पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.
या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.