केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. करोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. यापूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती.

केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी सरकारचा आदेश बंधनकारक आहे. हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.

महाराष्ट्र सरकारने याआधी जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार, प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी देण्याआधी त्यांचे रिपोर्ट चेक करा, अशी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला विनंती केली होती. दुसऱ्याबाजूला रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे.