मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, अजय राहिकर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना अंशतः दिलासा दिला. या सर्वांना ‘मोक्का’ कायद्यातून मुक्त करण्यात आले आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) या कायद्यातील कलमांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेतील अन्य कलमांतर्गत हा खटला चालणार आहे. शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींना या खटल्यातून मुक्त केले आहे.

मालेगाव बॉ़म्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. आम्हाला आरोपमुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यावतीने न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. मात्र दुसरीकडे पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, अजय राहिकर, रमेश उपाध्याय यांना ‘मोक्का’ कलमातून मुक्त केले. या सर्वांविरोधात आता मोक्काअंतर्गत खटला चालणार नाही. या सर्वांविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील कलम १८ आणि भारतीय दंड संहितेतील कलम ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य कलमांतर्गत खटला चालणार आहे. बॉम्बस्फोटातील दुचाकीचा वापर कशासाठी होणार याची साध्वी प्रज्ञाला कल्पना होती, त्यामुळे साध्वी प्रज्ञाची कटाच्या आरोपातून मुक्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तर शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी मशिदीबाहेर बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. रमझानच्या अजाननंतर मशिदीबाहेर पडलेल्या सात जणांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास करत हिंदूत्ववादी संघटनांनी हा स्फोट घडवल्याचा गौप्यस्फोट केला होता. साध्वी आणि पुरोहित यांच्यासह एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या एटीएसने आरोपपत्र मात्र १४ जणांविरोधातच दाखल केले होते. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे.