पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. त्यात मागील वर्षी करण्यात आलेला करार रद्द करून डोकलाममध्ये चीनने पुन्हा प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. अमेरिकन माध्यमातील सूत्रांनी ही माहिती समोर आणली आहे. यावरून भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

गलवान खोऱ्यातील संघर्षावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दररोज सरकारला प्रश्न विचारले जात आहे. गलवान खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न होत असताना भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे. “अमेरिकन माध्यमातील सूत्रांनी (न्यूयॉर्क टाईम्स आदी) म्हटले आहे की, मागील वर्षी चीनने भारतासोबत डोकलाम संदर्भात केलेला करार रद्द केला आहे. ज्या करारानंतर भारताने विजय झाल्याचा दावा केला होता. चीनने भूतानमधून आपलं सैन्य माघारी बोलोवलं होतं. आता सूत्रांचं म्हणणं आहे की, चिनी सैन्याने पुन्हा डोकलाममध्ये पुन्हा घुसखोरी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दल स्पष्टीकरण दिले पाहिजे अथवा ते निराधार असल्याचं सांगायला हवं,” सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

सध्या भारत-चीन सैन्य गलवान खोऱ्यात आमनेसामने आलं होतं. त्यात झालेल्या संघर्षातून २० भारतीय जवान हुत्मामा झाले होते. गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच डोकलाममध्ये चिनी सैन्यानं घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. याला परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणताही दूजोरा देण्यात आलेला नाही.