समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडल्यामुळे शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी ट्विटरवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज आहे. कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसाच्या वेषात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत”, असं ट्वीटर त्यांनी केलं आहे.

rabri devi tweet
उत्तर प्रदेशमध्ये महिलेशी गैरवर्तन प्रकरणावर राबडी देवींचं ट्वीट!

नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशमध्ये सध्या स्थानिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांसाठी लखीमपुर खीरीच्या पसगवा ब्लॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एक महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे. या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या महिलेचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. यामध्ये सदर मगिला घडलेला प्रकार सांगत आहे.

 

६ पोलिसांचं निलंबन!

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ६ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये एक सीओ, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याला अटक केली असून दुसऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, या प्रकारानंतर समाजवाजी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या सगळ्या प्रकाराच व्हिडीओ ट्वीट करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता के भूखे योगी के गुंडे, चुनाव जीतने के लिए नारी का अपमान”, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी टीका केली आहे.