पक्षकार्यकर्त्यांसमवेत अधिकाधिक वेळ घालविता येणे शक्य व्हावे आणि सरकारच्या कारभारावर देखरेख ठेवता यावी यासाठी २०१२ च्या निवडणुकीत पक्षाला उल्लेखनीय यश मिळूनही आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही, असे सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
पक्षाला यश मिळाल्यानंतर आपण स्वत:ऐवजी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री केले, त्यामुळे पक्षाचे काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. आपल्या नावावर मते मागितली होती, त्यामुळे आपणच मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा होती, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.
तथापि, पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत राहण्यासाठी आणि सरकारच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी आपण मुख्यमंत्री झालो नाही, असे ते म्हणाले.
मात्र अखिलेश सरकार इतके उत्तम काम करील, पक्षाचा जाहीरनामा राबवील, असे वाटले नव्हते, असेही ते म्हणाले.
दादरी प्रकरणात भाजपचा हात
दादरी येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, या हत्येमागे तीन जण असून ते भाजपशी संबंधित आहेत, पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केल्यास आपण त्यांना या तिघांची नावे सांगण्यास तयार आहोत, असेही मुलायमसिंह म्हणाले.