वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. मुस्लिम महिलांचा त्यांच्या धर्मात सन्मान होत नाही. त्यांनी त्यांचा धर्म सोडावा आणि हिंदू मुलांशी लग्न करावे असे वक्तव्य साध्वी प्राची यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साध्वी प्राची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत साध्वी प्राची यांनी मुस्लिम महिलांना हिंदू मुलांशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जे मौलवी मुस्लिम महिलांसाठी हलालाचा फतवा काढतात त्यांच्या मुस्कटात लगावली पाहिजे. एवढेच नाही तर जे मौलवी हलालाचे समर्थन करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे असेही साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर मी लवकरच तीन तलाक पीडित निदा खान आणि तिच्यासारख्या इतर महिलांची भेट घेणार आहे आणि त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची विनंती करणार आहे असेही साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. आपल्या या वक्तव्याच्या एक दिवस आधीच साध्वी प्राची यांनी असे वक्तव्य केले होते की राहुल गांधी २०१९ च्या निवडणुका हरणार आहेत निदान आता तरी त्यांनी लग्नाचा विचार करावा. एवढेच नाही तर २०१९ च्या आधी राम मंदिराची निर्मिती सुरू केली जाईल यासाठी सगळे साधू संत एकत्र आले आहेत असेही साध्वी प्राची यांनी स्पष्ट केले.