ग्रामीण भारताचा विकास या ध्येयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘संसद आदर्श ग्राम योजना’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. जवळपास ८०० खासदारांनी २०१९पर्यंत प्रत्येकी तीन गावांत भौतिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा विकसित कराव्या, असे आवाहन मोदी यांनी केले.स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणाच्या वेळी मोदी यांनी सदर योजनेची घोषणा केली होती. खासदारांनी कोणतेही गाव निवडावे, मात्र ते स्वत:चे अथवा आप्तेष्टांचे गाव असू नये, असे मोदी यांनी म्हटले होते. आपण स्वत: वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघातील गावाची निवड करणार असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक खासदाराने प्रत्येकी तीन गावे दत्तक घेतली तर २०१९ पर्यंत २५०० गावे विकसित होतील. प्रत्येक संसद सदस्यांने २०१६ पर्यंत किमान एक गाव विकसित करावे, असेही मोदी म्हणाले. या अनुभवाच्या जोरावर प्रत्येक खासदार पुढील तीन वर्षांत म्हणजेच २०१९ पर्यंत प्रत्येकी तीन गावांचा विकास करू शकतो, असेही ते म्हणाले.संसदेचे ८०० खासदार आहेत, २०१९ पर्यंत प्रत्येक खासदाराने तीन गावे विकसित केली तर २५०० गावांचा विकास होईल आणि त्याच धर्तीवर राज्यांनी आमदारांसाठी योजना हाती घेतल्यास सहा ते सात हजार गावांचा यामध्ये समावेश होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.म. गांधीजींच्या विचारसरणीने प्रेरणाराष्ट्रपिता म. गांधीजींच्या विचारसरणीने आपण प्रभावित झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वप्नातील ग्रामविकास योजनेची सुरुवात करताना सांगितले.गावात वीज आणण्यासाठी केवळ विजेचे खांब आणणे गरजेचे नाही तर उत्तम शिक्षण आणि मूल्यांची जपणूक करूनही तुम्ही जीवन प्रकाशमान करू शकता, असे द्रष्टेपण म. गांधीजींकडे होते, असेही मोदी म्हणाले.