झपाट्याने वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची पॉझिटिव्ह बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, करोनाचा गुणाकार आता मंदावला आहे. करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी १०.५ दिवस लागत होते. आता हा दर १२ दिवसांवर आला आहे. म्हणजेच करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी १२ दिवस लागतात, असा आता नवा अंदाज आहे. याशिवाय इतर देशांच्या तुलनेत भारतातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी आहे. एकूण रुग्णांच्या केवळ ३.२ टक्के रूग्णांचा मृत्यू होतो, अशी सध्या आकडेवारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे एका दिवसात तब्बल दहा रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

भारताने केल्या १० लाख करोना टेस्ट
शनिवारपर्यंत भारताने एकूण १० लाख करोना टेस्ट केल्या आहेत. एका दिवसात जवळपास ७४ हजार टेस्ट केल्या जात आहेत.

देशात ३१९ जिल्ह्यांमध्ये करोनाचा रुग्ण आढळलेला नाही, ही एक समाधानाची बाब आहे. १३० जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत. तर २८३ जिल्हे हे नॉन-हॉटस्पॉट आहेत. म्हणजेच या २८३ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे.