कर्तारपूर कॉरिडोर पायाभरणीच्या कार्यक्रमानंतर पाकिस्तानहून परतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर अकाली दलाने हल्लाबोल केला आहे. अकाली दलाच्या नेत्या आणि मोदी सरकारमधील मंत्री हरसिमरत कौर यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानचे एजंट असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानी जनरल बाजवा यांनी आमच्या जवानांची हत्या केली त्यांचीच गळाभेट सिद्धू घेतात, असंही त्या म्हणाल्या.


खलिस्तानी नेता गोपाल चावला यांच्यासोबतचा सिद्धूंचा फोटो समोर आल्यावरुन बोलताना कौर म्हणाल्या सिद्धूंचा फोटा एका दहशतवाद्यासोबत दिसतो. पाकिस्तानात गेल्यापासून ते पाकिस्तानचे एजंट बनलेत. आमच्या जवानांची हत्या करणाऱ्या बाजवाची ते गळाभेट घेतात. पाकिस्तानात तीन दिवस सिद्धी त्यांच्यासोबतच होते. काँग्रेसची दुटप्पी भूमिका समोर आलीये, राहुल गांधींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, चावला किंवा चिमा यांना मी ओळखत नाही. पाकिस्तानात माझ्यासोबत 5 ते 10 हजार फोटो काढण्यात आले, त्यामध्ये चावला किंवा चीमा कोण आहे त्याला मी ओळखत नाही असे स्पष्टीकरण सिद्धू यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर दिले. याशिवाय, भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्व संपले पाहिजे. कर्तारपूर कॉरिडोरच्या निमित्ताने ७१ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. भारत आणि पाकिस्तान सरकारने चांगला निर्णय घेतला. कर्तारपूर कॉरिडोर हा ईश्वराने बनवलेला रस्ता आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.