पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ लवकरच पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी शांततेसाठी बोलणी करणार आहेत. दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यापूर्वी त्याचे स्वरूप काय असावे, यासाठी त्यांनी जमात उलेमा-ए-इस्लाम या संघटनेचे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांच्याशी नुकतीच रावळपिंडी येथे चर्चा केली. या वेळी पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि माहिती मंत्री परवेझ रशीद हेही उपस्थित होते. दहशतवाद्यांशी होणाऱ्या संभाव्य चर्चेच्या योजनेतील प्रगती शरीफ यांनी रेहमान यांना सांगितली. रेहमान यांच्या संघटनेचा पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबतही या वेळी चर्चा झाली. पाकिस्तानमध्ये शांतता नांदावी, यासाठी दहशतवाद्यांशी होणारी चर्चा महत्त्वपूर्ण असून काही जहाल गट त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, मात्र सरकारने या योजनेवर ठाम राहावे, अशी प्रतिक्रिया रेहमान यांनी व्यक्त केली.