ब्राह्मण समाजाविरुद्ध कथित अपमानास्पद शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही सांगत त्यांनी वडिलांवरील कारवाईचं समर्थन केलं आहे.

‘सर्व ब्राह्मण समाज’ या संघटनेच्या तक्रारीच्या आधारे डी.डी. नगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. धर्म, वंश इ. आधारावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे यांसह इतर आरोपांखाली भादंविच्या विविध कलमांखाली हे प्रकरण नोंदवण्यात आले आहे.

ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन; पोलिसांकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसेच ब्राह्मणांना आपल्या खेडय़ात प्रवेश करू देऊ नका असेही सांगितले, असे संघटनेने तक्रारीत म्हटले आहे. ब्राह्मणांना देशातून ‘घालवून द्या’ असेही आवाहन ते लोकांना करत असल्याचा आरोप त्यांनी बघेल यांच्यावर केला आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद शेरेबाजी केली होती, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे ते म्हणाले.

“कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षी वडील असले तरी…छत्तीसगड सरकार सर्व धर्म, प्रांत, समाज आणि त्यांच्या भावनांचा आदर करतं. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सांप्रदायिक शांतता भंग झाली आहे. मलादेखील त्यांच्या वक्तव्यामुळे वाईट वाटत आहे,” असं भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे.