देशात धार्मिक असहिष्णुता वाढत असल्याचा निषेध
देशातील ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ विरोधात प्रख्यात मल्याळी लेखिका सारा जोसेफ व हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. तर, मल्याळम कवी के. सच्चिदानंदन यांनीही कन्नड लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ साहित्य अकादमीतील सर्व पदे सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
कन्नड साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या आणि दादरीतील घटना यांच्या पाश्र्वभूमीवर ‘वाढत्या असहिष्णुतेचा’ निषेध करणाऱ्यांमध्ये शनिवारी बरेच साहित्यिक सामील झाले आहेत. कृष्णा सोबती यांनी तर साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारी छात्रवृत्तीही परत केली. उर्दू कादंबरीकार रहमान अब्बास यांनी आपण महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार असल्याचे जाहीर केले.
पुरस्काराची रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह आपण लवकरच अकादमीला परत पाठवू, असे सारा जोसेफ यांनी सांगितले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाचे धार्मिक ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या. दादरीतील घटनेबाबतच्या नाराजीमुळे मी पुरस्कार परत करण्याचे ठरवले असून, आमच्या भोवतीच्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आता वेळ आली आहे, असे अब्बास यांनी सांगितले.
साहित्य अकादमी ही संस्था लेखकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या तसेच विचारस्वातंत्र्य टिकवण्याच्या आपल्या कर्तव्यात ‘अपयशी’ ठरल्याचे सांगून, मल्याळम कवी सच्चिदानंदन यांनीही अकादमीच्या सर्व समित्यांचा राजीनामा दिला. ते अकादमीची सर्वसाधारण परिषद, कार्यकारी मंडळ आणि आर्थिक समितीवर होते.
या प्रकरणी साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता आपण लेखकांच्या भावनांचा आदर करतो आणि धर्माधतेचा निषेधही करतो, परंतु कार्यकारी मंडळाच्या संमतीशिवाय सरकारविरुद्ध वक्तव्य करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक लेखकांनी सामूहिकरित्या त्यांचे पुरस्कार परत करावेत आणि संस्थांमधील पदांचे राजीनामे द्यावेत यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे इतर काही लेखकांनी सांगितले. रालोआ सरकार भाषणस्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रविकुमार, परक्कडवू पद सोडणार
मल्याळम लेखक के.एस. रविकुमार व लघुकथाकार पी. परक्कडवू यांनीही आपण अकादमीचे सदस्यत्व सोडणार असल्याचे म्हटले आहे. हिंदी लेखक उदय प्रकाश हे याच मुद्दय़ावर साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे पहिले साहित्यिक होते.
इंग्रजी लेखक आणि माजी आयपीएस अधिकारी केकी दारूवाला यांनी साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांना पत्र लिहून, लेखकांविरुद्ध घडत असलेल्या गुन्ह्य़ांबाबत अकादमी मौन बाळगत असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये देशात भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. देशाचे धार्मिक ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे.
– सारा जोसेफ, लेखिका