रविवारी भारताने ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करत असतानाच दुसरीकडे लंडनमध्ये मात्र मोदी राजीनामा द्या अशा मागणीचे बॅनर लावून आंदोलन करण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं. दक्षिण आशियामधील विषयांसंदर्भात काम करणाऱ्या काही नागरिकांनी भारतामध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारविरोधात हे आंदोलन लंडनमधील ब्रिटीश संसदेजवळ असणाऱ्या प्रसिद्ध वेस्ट मिनिस्टर ब्रिजवर बॅनर झळकावत केलं. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती. 'रिझाइन मोदी', असे शब्द लिहिलेले मोठ्या आकाराचे बॅनर लंडनच्या संसदेजवळ असणाऱ्या वेस्ट मिनिस्टर ब्रिजवर झळकावण्यात आलेले. भारतीय उच्चायुक्तालयासमोर या आंदोलकांनी मेणबत्ती हातात घेऊन शांततेच मोर्चाही काढल्याची माहिती दिली. "मोदींची सरकार असताना मरण पावलेल्यांसाठी हे आंदोलन आहे," अशी माहिती आंदोलकांनी दिली. आंदोलन करणाऱ्या साऊथ आशिया सॉलिडॅरिटी गटाने हे आंदोलन केलं. आयोजकांपैकी एक असणाऱ्या मुक्ती शाह यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. "भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस उजाडत असतानाच धर्मनिरपेक्ष राज्यघटना फसली आहे," अशी टीका शाह यांनी केली. "करोनाचा प्रादुर्भाव होत असतानाच देशामधील अनेक तुरुंगामध्ये हजारो राजकीय कैदी अडकून पडले आहेत. शेकडो, हजारो लोकांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना गमवाल्याचं दु:ख सहन करावं लागतंय. हे सगळं सरकारने परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने आणि करोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळ्यात अपयश आल्याने होत आहे," असं शाह म्हणाल्या. या गटाने एक पत्रक जारी करत मोदींनी राजीनामा का द्यावा याची दहा कारणे सांगितली आहेत. 1/ As dawn broke in London today, members of the diaspora and friends of India in the UK dropped a huge banner reading #ResignModi from Westminster Bridge. #indiaIndependenceday #IndependenceDayIndia #IndependenceDay2021 pic.twitter.com/sNfCs3OHRX — SouthAsia Solidarity (@SAsiaSolidarity) August 15, 2021 देशाच्या राजधानीमध्ये उघड उघडपणे 'मुस्लिमांचे हत्याकांड घडवून आणण्यासंदर्भात भाष्य' करण्यात आलं. जंतर मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाविरोधात जाहीर भाषणामध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यावरुन ही टीका करण्यात आलीय. भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. "झुंडबळी, नियोजन करुन आणि पोलिसांनी मुस्लीम लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणांवर केलेले हल्ल्यांच्या घटना आता सामान्य गोष्टी झाल्या आहेत," अशी टीकाही या गटाने केलीय. 2/ Earlier they held a candlelit vigil at the Indian High Commission to remember all those killed under the Modi regime #ResignModi #IndependenceDay #IndependenceDayIndia2021 pic.twitter.com/dm2QcNIckl — SouthAsia Solidarity (@SAsiaSolidarity) August 15, 2021 दलित महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंदर्भातही हा गटाने चिंता व्यक्त केलीय. हतरस प्रकरणाबद्दल उल्लेख करत १४ सप्टेंबर २०२० रोजी १९ वर्षीय दलित तरुणीची हत्या करण्यात आल्याचं सांगत उच्च जातीच्या चार आरोपींनी बलात्कार करुन मुलीला ठार केल्याचं सांगण्यात आलंय. दिल्लीमध्ये ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना १ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचाही उल्लेख या पत्रकात आहे. "पंतप्रधान या प्रकरणांवर काहीही बोलत नाहीत. हे निंदनीय आहे," असं या गटाने म्हटलं आहे. या गटाने केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांनाही विरोध केला आहे. या कायद्यांमुळे गरीब, निराधार आणि भूमिहीनतेत जगणारा शेतकरी आणखीन संकटात सापडेल असं या गटाचं म्हणणं आहे.