निरक्षरतेच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मुलांनी आता वह्य़ा-पुस्तके उचलून शिक्षणासाठी सज्ज व्हावे, एक मूल-एक शिक्षक, एक वही-एक पेन सगळे जग बदलू शकते हे ध्यानात ठेवा, असा प्रेरणादायी संदेश पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेली शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिने संयुक्त राष्ट्रांमध्ये आज दिला. तिचा आज वाढदिवस होता व तो मुलींच्या शिक्षण हक्कासाठी म्हणून मलाला दिन म्हणून साजरा केला जातो.ती म्हणाली, आपल्यावर हल्ला झाला तेव्हा जगातील लाखो लोकांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर प्रार्थनाही केल्या. त्यांचे आपण ऋणी आहोत. मलाला दिन हा आपला एकटय़ाचा नाही तर तो प्रत्येक स्त्रीचा, मुलगी व मुलगा या सर्वाचा आहे, ज्यांनी त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला त्यांचा आहे. ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तालिबान्यांनी आपल्यावर व मैत्रिणींवर गोळ्या झाडल्या, गोळ्या झाडून सगळ्यांना शांत करता येईल असे त्यांना वाटले पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्या शांततेतून अनेक आवाज उठले, निराशा संपली व त्याच्या जागी धैर्य व शक्तीने जन्म घेतला. ‘मी तीच मलाला आहे, माझ्या महत्त्वाकांक्षा त्याच आहेत, आशा त्याच आहेत, स्वप्ने तीच आहेत पण बंधू-भगिनींनो मी तालिबानचा सूड घेण्यासाठी येथे बोलायला आले नाही, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या हक्काची दाद फिर्याद मांडण्यासाठी आले आहे. तालिबान्यांच्या मुले व मुलींनाही शिक्षण मिळाले पाहिजे. ही सहवेदना मी महंमद पैगंबर, येशू ख्रिस्त, बुद्ध, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला व महंमद अली जीना यांच्याकडून शिकले आहे. महात्मा गांधी, मदर तेरेसा यांनीही हेच शिकवले आहे. लेखणी ही तलवारीपेक्षा ताकदवान असते ते खरे आहे. दहशतवादी हे पुस्तके व लेखणीला घाबरतात, ते शिक्षणाला घाबरतात, ते स्त्रियांना घाबरतात असे ती म्हणाली.