आसाममध्ये गाय चोरीच्या संशयावरुन जमावाने मारहाण करत एकाची हत्या केली आहे. बिस्वनाथ जिल्ह्यात ही घटना घडली असून हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्राथमिक तपासात संकेत नावाच्या व्यक्तीकडून दोन गाईंची चोरी करत चौघेजण पळ काढत होते. ज्या गाडीतून ते जात होते त्याला नंबर प्लेटही नव्हती.

दरम्यान संकेत यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच गावकऱ्यांनी चौघांना थांबवलं आणि चोर म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्ही गाई आणि गाडी ताब्यात घेतली आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.

गावातीलच एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल केले आणि चौघांची सुटका केली. पोलिसांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केलं. ‘चौघांमधील एकाचा मृत्यू झाला असून इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत्यू झालेल्याची ओळख देबेन अशी पटली असून इतरांची नावे पुजन घटोवार, फुलचंद साहू आणि बिजॉय अशी आहेत. चौघेही जवळच्याच गावचे रहिवासी असून डुकरांचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी पीडित आणि मारहाण करणारे अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.