दहशतवादी कारवाया, लष्करी यंत्रणेचा वचक आणि आर्थिक चणचण अशा संकटांमुळे गेली अनेक वर्षे राजकीय अस्थैर्याखाली वावरत असलेल्या पाकिस्तानच्या जनतेने रविवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीएमएल-एन) पक्षाला कौल देत सत्तास्थानी बसवले. तालिबानच्या धमक्यांना भीक न घालता जनतेने निर्भयपणे केलेले मतदान आणि देशाच्या इतिहासात प्रथमच लोकशाही मार्गाने झालेले सत्तांतर या निवडणुकीची वैशिष्टय़े ठरली. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या निकाल व कल यांच्यानुसार पीएमएल-एन पक्षाला १२५हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज असून छोटय़ा पक्षांच्या मदतीने नवाझ शरीफ हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये एका नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लाहोर येथे समर्थकांसमोर बोलताना शरीफ यांनी पाकिस्तानच्या मतदारांचे आभार मानले व दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा वायदा केला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय धोरण करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. ‘अंतिम निकालात आमच्या पक्षाला निखळ बहुमत मिळेल अशी प्रार्थना लोकांनी करावी कारण तसे झाले तर आपल्याला कमकुवत आघाडी सरकारचे नेतृत्व करावे लागणार नाही,’ असेही ते म्हणाले.

भारतासाठी आश्वासक निकाल
नवाझ शरीफ यांच्या पक्षाचा विजय भारतासाठीही आश्वासक ठरणारा आहे. कारण विजयानंतर केलेल्या भाषणात शरीफ यांनी भारत-पाकिस्तान शांतता चर्चा पुढे नेण्याचा मनोदय जाहीर केला. १९९७ते १९९९ या कालावधीत सत्तेत असताना शरीफ यांनी भारतातीतल तत्कालीन वाजपेयी सरकारशी शांतता वाटाघाटींसाठी पुढाकार घेतला होता. शरीफ यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करतानाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले.

* पीटीआय
इम्रान खान यांचा पक्ष निष्प्रभ.
अवघ्या ३४ जागा पारडय़ात.
प्रमुख विरोधी पक्ष बनण्याची संधी.

* पीपीपी
सत्ताधारी पक्षाला जबरदस्त दणका. ३२ जागा; तिसऱ्या स्थानावर घसरण.
माजी पंतप्रधान अश्रफ पराभूत.