कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाकिस्तानचे काही विद्यार्थी चीनमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, पाकिस्तानच्या सरकारने अद्याप या विद्यार्थांना वाचवण्यासाठी कुठलेही पाऊल उचलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना सुनावले असून भारताकडून काही शिकण्याचा सल्लाही दिला आहे.

कठीण परिस्थितीत आपल्या देशातील सरकारकडून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरुन सरकारला धारेवर धरले आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी आपल्या देशात परतण्यासाठी एका बसमध्ये बसताना दिसत आहेत. या बसचे एका पाकिस्तानी विद्यार्थीनीने आपल्या फोनच्या कॅमेरॅत चित्रीकरण केलं आहे. त्यात तीने आपल्या सरकारला जाबही विचारला आहे.

हा व्हिडिओ पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत एक विद्यार्थिनी म्हणत आहे की, “हे लोक भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या दुतावासाने एक बस पाठवली आहे. वुहान विद्यापीठातून ही बस विमानतळापर्यंत नेली जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवे जाईल. बांगलादेशकडूनही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मदत येणार आहे.”

या विद्यार्थ्यीने पुढे म्हटले की, “आम्ही पाकिस्तानी विद्यार्थी आहोत जे चीनमध्ये अडकून पडलो आहोत. आम्हाला आमचे सरकार म्हणते की, आपण जिवंत रहा किंवा मरा, या आजाराची लागण होत असेल तर होऊ द्या. आम्ही तुम्हाला देशात आणणार नाही किंवा कोणतीही सुविधा पुरवणार नाही. आपल्याला लाज वाटायला हवी पाक सरकार. आपल्याला भारताकडून काही शिकण्याची गरज आहे की, ते कसे आपल्या नागरिकांची मदत करीत आहेत.”

दरम्यान, पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेताना म्हटले होते की, “जर आपण लोकांना तिकडून आणण्याचं बेजबाबदार काम केलं तर हा व्हायरस जंगलातील वणव्याप्रमाणे संपूर्ण जगात पसरेल.”