देशातील करोनाचा संसर्ग अद्याप अटोक्यात आलेला नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालेला असल्याने, सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. मात्र अद्याप सर्वसामान्यांसह अनेकांना याबाबतचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी करोना संसर्ग दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीआय)कडून आता कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

“विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशाने मास्क व्यवस्थित घातलेला नसेल किंवा कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सुचनांनुसार त्यांची वागणूक नसेल, तर त्याला विमानातून खाली उतरवले जाणार आहे. वारंवार सूचना करूनही जर एखादा प्रवासी नियमांचे पालन करत नसेल, तर त्याला बेशिस्त प्रवासी ठरवलं जाईल व त्याला शिक्षेला सामोरं जावं लागेल,” असं डीजीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान प्रत्येकवेळी मास्क घालणं अनिवार्य राहील आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. मास्क नाकाच्या खाली आलेला चालणार नाही.विमानतळावर प्रवासी प्रवेश करण्या अगोदर त्याने मास्क घातलेला आहे की नाही याची सीआयएसएफचे जवान तपासणी करणार आहेत. विनामास्क असलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय सीएएसओ व अन्य अधिकारी देखील याची खबरदारी घेणार आहेत.

तसेच, विमानतळ परिसरात देखील प्रवाशांना मास्क परिधाना केलेलं असणं अत्यावश्यक असुन, सोशल डिस्टंसिंगचं देखील पालन करावं लागणार आहे. जर कुणी नियमांचे पालन करत नसेल व वारंवार करण्यात आलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याला सुरक्षा रक्षकांकडे सोपवलं जाईल. तसेच, विमानात बसल्यानंतर जर मास्क व्यवस्थित घातलेला नसेल तर, त्याला विमान उड्डाण घेण्याअगोदर खाली उतरवलं जाईल.