उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. करोना कालावधीमध्ये सरकारकडून देण्यात आलेल्या अन्नधान्याच्या मदतीसंदर्भात भाष्य करताना ज्या कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या जास्त आहे त्यांना सरकारकडून कमी मदत राशन मिळालं, असं रावत म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी ज्यांनी २० जन्माला घातली त्यांना अधिक मदत मिळाली यामध्ये त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवून काही होणार नाही. तुम्ही जास्त मुलं जान्माला घातली नाही हा तुमचा दोष आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य रावत यांनी केलं.

नैनिताल जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना रावत यांनी उत्तम दर्जाचा तांदूळ करोना काळात मदत म्हणून गरीब आणि गरजू कुटुंबाना देण्यात आल्याचा दावा केलाय. मदत म्हणून देण्यात आलेला एवढ्या चांगल्या दर्जाचा तांदूळ आपण यापूर्वी पाहिलेला नाही. काहींनी तर हा तांदूळ साठवून नंतर विकला, असं रावत म्हणाले. करोना कालावधीमध्ये मदत म्हणून करण्यात आलेल्या धान्यवाटपासंदर्भात बोलताना रावत यांनी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो धान्य देण्यात आल्याचं सांगितलं. “ज्यांना १० मुलं आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळालं. ज्यांना २० आहेत त्यांना क्विंटल धान्य मिळालं. ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना १० किलो मिळालं,” असं राव यांनी म्हटलं. विशेष म्हणजे हे भाषण रावत यांच्या फेसबुक पेजवरुन लाइव्ह वेबकास्ट करण्यात आलं होतं. मात्र नंतर ते डिलीट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केल्याचा दावा

याच भाषणादरम्यान रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करताना एक विचित्र वक्तव्य केलं. या करोना कालावधीमध्ये भारतामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले, अशा शब्दांमध्ये तीरथ सिंह रावत यांनी मोदींचे गुणगाण गायले. पुढे बोलताना, “इतर देशांपेक्षा भारत करोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहेत. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावरराज्य केलं ते या करोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये ३.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे,” असंही रावत म्हणाले.

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मागील दोन आठवड्यांमध्ये सतत चर्चेत असणारे तीरथ सिंह रावत या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारे वादग्रस्त आणि टीका होणारं वक्तव्य करण्याची रावत यांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी रावत यांनी फाटक्या जीन्स (रिप्ट जीन्स) घालणाऱ्या महिलांच्या संस्कारासंदर्भात वक्तव्य केलं होतं. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर एका ठिकाणी भाषण देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यात भगवान श्री राम आणि श्री कृष्णाप्रमाणे पुजा केली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी चुकीचा संदर्भ देणारं वक्तव्य करुन विरोधकांना आयती संधी उपलब्ध करुन दिलीय. भाजपाचा एक नेता आपल्याला शिक्षणाचे महत्व किती आहे पटवून देताना, असं म्हणत एका काँग्रेस नेत्याने रावत यांच्या या वक्तव्यावर टीका केलीय. तर समाजवादी पक्षाचे नेते जुही सिंग यांनी अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं पण कधी?, असा सवाल उपस्थित केलाय.