मालेगाव स्फोट खटल्यात एनडीए सरकार सरकारी पक्षावर दबाव आणत असल्याचा आरोप एका कार्यकर्त्यांने केला असून, या प्रकरणाची सुनावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हर्ष मांदेर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी (एनआयए) विशेष सरकार वकील रोहिणी सॅलियन यांच्यावर आरोपीबाबत सौम्य भूमिका घेण्यासाठी दबाव आणत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आरोपींबाबत सौम्य भूमिका घ्यावी, असा दबाव विशेष सरकारी वकिलांवर गृहमंत्रालयाकडून आणण्यात येत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून हा खटला योग्य पद्धतीने चालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.