रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने गोयल कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप करत पंतप्रध नरेंद्र मोदींनी पियूष गोयल यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पियूष गोयल यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले. पियूष गोयल यांची पत्नी सीमा गोयल यांची मालकी असलेल्या इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये फक्त १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली. अवघ्या १० वर्षात या कंपनीचा नफा ३० कोटी रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे कंपनीचे उत्पन्न कशातून मिळते, याबाबत नेमकी माहिती देण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला. याशिवाय शिर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या राकेश अग्रवाल आणि मुकेश बन्सल यांच्याशी देखील पियूष गोयल यांची जवळीक आहे. या दोघांनी बँकेचे जवळपास ६५० कोटी रुपये थकवले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

पियूष गोयल २०१४ पर्यंत इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. मे २०१४ मध्ये केंद्रात मंत्रिपदी संधी मिळताच त्यांनी कंपनीचा राजीनामा देत त्यांच्याकडील शेअर्स पत्नीच्या नावावर केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मोदी सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते. पण त्यांच्या दाव्यांची आता पोलखोल होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या आरोपांनंतर भाजपा गोयल यांच्या बचावासाठी मैदानात उतरली आहे. काँग्रेस गोयल यांच्यावर खोटे आरोप करत आहे. गोयल हे सीए असून इंटरकॉन एडव्हायजर्स या कंपनीच्या मार्फत त्यांनी अनेकांना आर्थिक सेवा पुरवली आहे, असे भाजपाने सांगितले. शिर्डी इंडस्ट्रीज या कंपनीशीही गोयल यांचा संबंध नाही. २००८ ते २०१० या कालावधीत ते कंपनीचे संचालक होते. त्यानंतर त्यांचा या कंपनीशी काहीही संबंध नाही, असा दावा भाजपाने केला आहे. काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच काँग्रेसचा हा खटाटोप सुरु आहे, असा चिमटाही भाजपाने काढला आहे.