पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ पुन्हा एकदा सुरु होणार आहे. येत्या ३० जूनपासून ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार आहे. गेल्या महिन्यांत देशात नवे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.

MyGovIndia या ट्विटर हॅंडलवर मंगळवारी यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये जनतेला उद्देशून म्हटले की, नरेंद्र मोदींनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार पुन्हा एकदा स्विकारल्यानंतर ‘मन की बात’ पुन्हा सुरु होत आहे. या कार्यक्रमासाठी तुमची माहिती, कल्पना तसेच सूचना पाठवाव्यात, ३० जून २०१९ रोजी प्रसारित होणाऱ्या भागात त्या समाविष्ट होतील.

दुसऱ्या मालिकेतील हा पहिला भाग ‘ऑल इंडिया रेडिओ’वरुन अर्थात ‘आकाशवाणी’वरुन प्रसारीत केला जाईल. पहिल्या मालिकेतील शेवटचा भाग लोकसभा निवडणुकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसारीत झाला होता. त्यावेळी मोदींनी म्हटले होते की, रेडिओवरील हा कार्यक्रम माझ्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव होता.

‘मन की बात’मधून जनतेचे प्रश्न आणि या प्रश्नांसंबंधीच्या संकल्पनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे विचार मांडणार आहेत. त्यासाठी तुमच्या कल्पना शेअर करण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आहे. यासाठी फोन लाईन्स ११ जून ते २६ जून या काळात खुल्या होतील. त्यावर जनतेला माहिती देण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.