आजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत अनेकजण प्रथेप्रमाणे उपवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत. आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपेल, त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल. नवरात्रौत्सवाच्या काळात दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. आज घटस्थापन झाल्यानंतर दुर्गेचे पहिले रूप असणाऱ्या शैलपुत्री देवीची उपासना केली जाईल.

नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात ते फक्त पाणीच पितात. इतके कडक उपवास असूनही ते कामाचा व्याप कसा सांभाळतात, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडतो. मात्र, मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही. याशिवाय, दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. याशिवाय, गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.

देवीचीही वाट खडतर!

दरम्यान, शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्यभरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात मंडळे तसेच गरबा आयोजन करणाऱ्यांकडून ध्वनिवर्धकासंदर्भात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. उत्सवाच्या कालावधीत अष्टमी (२८ सप्टेंबर) आणि नवमी (२९ सप्टेंबर) या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लाकडी फळय़ांवर गरब्याच्या पावलांचा ठेका