झारंखडमध्ये तबरेज अन्सारी झुंडबळी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. कारण, झारखंड पोलिसांनी या मारहाण प्रकरणातील सर्व ११ आरोपींवरील हत्येचे ३०२ कलम हटवले आहे. शवविच्छेदन अहवालात तबरेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपींवरील हत्येचा कलम हटवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी सर्व ११ आरोपींवरील हत्येचे कलम हटवताना म्हटले, “जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तबरेज अन्सारीचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना दिसून आले की, तणाव आणि हृदयाची धडधड थांबल्याने तबरेजचा मृत्यू झाला होता.” शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आता आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होणार नाही. मात्र, भादंवि कलम ३०४ अंतर्गत (मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी) आरोपींविरोधात खटला चालणार आहे.

तबरेज अन्सारी या २२ वर्षीय तरुणाला दुचाकी चोरीच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी त्याला जमावाने जबरदस्तीने जय श्रीराम, जय हनुमान म्हणण्यासही भाग पाडले होते. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, यामध्ये जमावाने तबरेजला एका खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचे चित्रीत झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तबरेजला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याची प्रकृती बिघडत गेली आणि २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, तबरेज अन्सारीची पत्नी शाईस्ता परवीनने सरायकेला पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये तिने म्हटले होते की, तबरेज अन्सारी जमशेदपूरवरुन दुचाकीवरुन घरी परतत असताना रस्त्यात त्याला काही लोकांनी अडवले आणि झाडाला बांधून बेदम मारहाण केली. यावेळी त्याला जय श्रीराम बोलण्यास भाग पाडण्यात आले होते.