केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपुरमध्ये भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी करणाऱ्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी थेट हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणानंतर आंदोलकांवर करवाई करण्याची मागणी ज्यांच्या घऱासमोर हा प्रकार घडला ते माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांनी केली होती. या प्रकरणामध्ये होशियारपुर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खास चार सदस्यांची टीमही तयार करण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

नक्की पाहा >> MSP, शेतमाल खरेदी अन् कृषी कायद्यांशी कंपनीचा संबंध काय?; ‘रिलायन्स’ने शेतकरी आंदोलनासंदर्भात मांडलेले ११ मुद्दे

भारती किसान युनियन राजेवालचे नेत्यांनी या प्रकरणामध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तातडीने हे गुन्हे मागे घेतले नाही तर सात जानेवारी रोजी जालंदरमधील रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलं आहे. तसेच सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर होशियारपूरमध्ये जो शेणाची ट्रॉली मंत्र्याच्या घरासमोर रिकामी करण्याचा प्रकार घडला तोच पुन्हा अनेक ठिकाणी पाहायला मिळेल असा इशाराही संघटनेनं दिला आहे.

तक्रारीत काय म्हटलं आहे?

या प्रकरणामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव सुरेंद्र पाल भट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे. आपण एक जानेवारी रोजी सूद यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असतानाच आंदोलकांनी ट्रॉलीमधून शेण आणून सूद यांच्या घरासमोर टाकलं. यावेळी या आंदोलकांकडे हत्यारंही होती असंही भट्टी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या आंदोलकांनी सूद यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही भट्टी यांनी केलाय. तसेच ट्रॅक्टर चालकाने सूद आणि त्यांच्या मित्रांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केल्याचंही भट्टी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> “शेतकऱ्यांनाही मोदी, शाह यांच्यासारखे मध्यस्थ नकोय ते थेट अंबानी, अदानींशी बोलतील”

सूद यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य

काही दिवसांपूर्वीच सूद यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने शेतकरी आंदोलकांनी त्यांच्या घरासमोर शेण टाकलं होतं. सिंघू येथे आंदोलन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच माहिती नसून काही शेतकरी केवळ पिकनिक म्हणून तिथे जात असल्याचं वक्तव्य सूद यांनी केलं होतं.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

कोणत्या कलमांखाली दाखल करण्यात आला गुन्हा

या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी कलम ४५२ (बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करणे), कलम ५०६ (गुन्हेगारी कृत्य) या गुन्ह्यांखाली तक्रा दाखल केल्याची माहिती होशियारपूरचे एसएसपी असणाऱ्या नवज्योत सिंह महाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. मात्र एफआयआरच्या कॉपीमध्ये सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं दिसून येत असून यामध्ये कलम ३०७ म्हणजेच हत्येचा प्रयत्न केल्याचं कलमही घरासमोर शेणाची ट्रॉली खाली करणाऱ्या आंदोलकांविरोधात लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर कलम १४८ म्हणजेच दंगल घडवण्याचा गुन्हाही आंदोलकांवर दाखल करण्यात आलाय.

नक्की वाचा >> “…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं”; आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

सूद यांनी केलं होतं आंदोलन

सूद यांच्या घरासमोर ट्रॉली खाली करताना आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या सूद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहीत राय बहादुर जोधमल रस्त्यावर धरणे आंदोलन करत घराच्या प्रवेशद्वारावर शेणाची ट्रॉली रिचवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. पंजाबमधील भाजपाचे प्रमुख अश्विनी कुमार यांनाही या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अल्याचे सांगत आलेल्या काही लोकांनी सूद यांच्या घरावर हल्ला केला आणि असं कृत्य केलं की ज्या माध्यमातून राज्यातील शांतंता भंग होईल, अशी टीका कुमार यांनी केली.

नक्की वाचा >> “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”