पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन देशातील सरकारचा निषेध केला आहे. चीनच्या नादी लागून इम्रान खान यांचे सरकार या भागामधील नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्याचं काम करत आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असणाऱ्या मुज्जफराबादामध्ये सोमवारी रात्री मोठ्या संख्येने स्थानिकांनी मशाल मोर्चा काढला. यावेळेस लोकांनी चीनच्या मदतीने बांधण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पाला विरोध केला. अनेकांनी चीनविरोधात घोषणाबाजीही केली.

मागील काही दिवसांपासून मुजफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक लोक रस्त्यावर उतरुन चीनच्या मदतीने येथील नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करताना दिसत आहेत.  हातात मशाल घेऊन हे लोक, “दरिया बचाओ, मुजफ्फराबाद बचाओ” आणि ‘नीलम-झेलम को बहने दो, हमें जिंदा रहने दो’ अशा घोषणा देत होते. या आंदोलनचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनेही ट्विटरवरुन शेअर केला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.  पाकिस्तानमध्य ट्विटरवर #SaveRiversSaveAJK  या हॅशटॅगच्या माध्यमातून इतर भागांमधील जनतेनेही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधील प्रस्तावांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

पाकिस्तान आणि चीनने नुकताच पाक व्याप्त काश्मीरमध्ये हायड्रोपॉवर प्रोजेक्ट उभारणीसंदर्भात करार केला आहे. आजाद पत्तन असं या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिनी कंपनी झेलम आणि नीलम नदीवर मोठी धरणे बांधून ७०० मेगावॅट वीज निर्माण करणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आले आहे. हा बंधारा म्हणजे चीनच्या महत्वकांशी योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पाकिस्तानने ७५ टक्के म्हणजेच १.१३ अरब डॉलरचे कर्ज घेतले आहे. तर २५ टक्के रक्कम ही इक्विटीच्या माध्यमातून उपलब्ध करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पाकिस्तानने हे कर्ज फेडण्यासाठी १८ वर्षांची मुदत मागितली आहे.

भारताने या वादग्रस्त भूभागावर धरणे बांधण्यास विरोध केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनाही या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने सर्वांचा विरोध झुगारुन, स्थानिकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला आहे. या ठिकाणी चीनने धरण बांधल्यानंतर येथील प्रदेशावर चीनचा प्रभाव वाढेल आणि स्थानिकांसमोर आणखीन अडचणी निर्माण होतील अशी भिती येथील नागरिकांना वाटत आहे.