पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. अमरिंदर सिंग यांनी घटनेनंतर ट्विट केलं असून दोषींना सोडणार नाही सांगत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. "विषारी दारु प्यायल्याने झालेल्या संशयित मृत्यूंप्रकरणी मी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. जालंधरचे आयुक्त संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. संबंधित एसएसपी आणि अधिकाऱ्यांशी ते समन्वय साधतील. दोषी आढळतील त्यांना सोडलं जाणार नाही," असं अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. I have ordered a magisterial enquiry into suspected spurious liquor deaths in Amritsar, Gurdaspur and Tarn Taran. Commissioner, Jalandhar Division will conduct the enquiry and coordinate with concerned SSPs and other officers. Anyone found guilty will not be spared. — Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) July 31, 2020 पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू २९ जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी बाटलामध्ये पाच आणि तरनतारन येथे चार मृत्यू झाले. पोलिसांनी याप्रकरणी बलविंदर कौर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचून पूर्ण माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यास सांगितलं आहे. कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.