राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचे मध्यस्थ म्हणून काम केले. पंतप्रधात नरेंद्र मोदी हे भ्रष्टच असून त्यांनी गोपनीयतेचेही उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मोदींनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोप त्यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

राफेल करारासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला माहिती नव्हती. परराष्ट्र मंत्रालय आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला(एचएएल) देखील कराराची माहिती नव्हती. मात्र, अनिल अंबानी यांना कराराच्या १० दिवसांपूर्वीच सर्व माहिती होती. नरेंद्र मोदी यांनी गोपनीयतेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदींनी गोपनीयतेचे उल्लंघन केले असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे. एखादा हेरासारखे मोदींनी काम केले असून त्यांना या प्रकरणात तुरुंगात टाकले पाहिजे. त्यांनी संरक्षण कराराची माहिती अनिल अंबानी यांना माहिती दिली होती, हा गंभीर प्रकार आहे, असे त्यांनी सांगितले.

फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याच्या घोषणेच्या १५ दिवस आधी, म्हणजे मार्च २०१५च्या चौथ्या आठवडय़ात उद्योगपती अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी बैठक घेतली होती, असे वृत्तात म्हटले होते. याचा दाखलाही राहुल गांधी यांनी दिला. या बैठकीनंतरच अनिल अंबानी यांनी कंपनीची स्थापना केली होती, असा आरोप राहुल गांधींनी केला. पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. त्यांनी संरक्षण संदर्भातील माहिती अशा व्यक्तीला दिली की ज्याला ही माहिती मिळणे अपेक्षित नव्हते, असे त्यांनी सांगितले.