‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर बॅनर्जी यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही अभिजित बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. याचबरोबर त्यांनी वाढत्या गरिबीवरून मोदी यांच्या बोचरी टीका केली आहे.

‘‘जागतिक दारिद्रय़ाशी सामना करताना या तिघांच्या संशोधनाची मोठी मदत झाली,’’ असे म्हटले आहे. जागतिक दारिद्रय़ाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्नांची विश्वासार्ह उत्तरे शोधून काढली. त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे गेलेले इतर अर्थशास्त्रज्ञ यांनी दारिद्रय़ाशी दोन हात करण्यात मोठी मदत केली आहे. त्यांच्या या अभ्यासातून भारतातील ५० लाख मुलांना लाभ झाला. तसेच रोगप्रतिबंधात्मक योजनांना अनुदाने देण्याच्या अनेक देशांनी अवलंबलेल्या धोरणाला या तिघांच्या संशोधनाचा मूलाधार होता, असं सांगत नोबेल निवड समितीने अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासह शास्त्रज्ञांचा गौरव केला.

बॅनर्जी यांना नोबेल जाहीर होताच भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या न्याय योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी अभिजित बॅनर्जी यांनी मदत केल्याचं राहुल यांनी सांगितलं.

राहुल म्हणाले, “अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांचं अभिनंदन. अभिजित यांनी भारतातील दारिद्र नष्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची क्षमता असणाऱ्या ‘न्याय’ संकल्पनेची मांडणी करताना मदत केली. पण, त्याऐवजी अर्थव्यवस्था नष्ट करून दारिद्रय वाढवणारे मोदीनॉमिक्स आता आपल्याकडे आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.