दि. ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान बूक आलेल्या रेल्वे तिकिटांवर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा (रिफंड) मिळणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे काऊंटरवर तिकीट बूक केलेल्यांसाठी हा नियम असणार आहे. ५०० व हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा सध्या चालत आहेत. त्यामुळे अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी महागडे रेल्वे तिकीट बूक करण्याचा मार्ग अवलंबला.
नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला झाला. या दिवशी रेल्वेचे २ हजार तिकीट बूक करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला तब्बल २७ हजार जणांनी एसी फर्स्ट क्लास श्रेणीचे तिकीट बूक केले. एकाच दिवसात रेल्वेची तिकीट कमाई ४ कोटींवरुन १३ कोटी रुपये झाली.
तिकिटाची वाढती बुकिंग पाहता दहा हजारांपेक्षा जास्त शुल्क असणाऱ्या तिकीटाचे रिफंड रोख न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र आता ही मर्यादा ५ हजार करण्यात आली आहे. दरम्यान ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचे तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने पॅन क्रमांक अनिवार्य केला आहे.