दिल्लीत भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार केला जात असून २०-२० कोटींना आमदारांना खरेदी केलं जातं असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत असा दावाही अशोक गेहलोत यांनी केला असून आमचे सहकारी भाजपच्या जाळ्यात अडकले असल्याचं म्हटलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला गेला होता असं सांगताना आमच्या बहुमत असल्याचं अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“उत्तम इंग्लिश बोलणं, हॅण्डसम दिसणं हेच सर्वकाही नसतं”, गेहलोत यांचा सचिन पायलट यांना टोला

“जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत. आम्हाला १० दिवसांसाठी आमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. अन्यथा मनेसर येथे जे झालं तेच येथेही होताना दिसलं होतं,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. “मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. नव्या पिढीवर आमचंही प्रेम आहे. शेवटी भविष्य त्यांचंच आहे. नवीन पिढी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष पद भूषवत आहे. आमच्यावेळी आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता तो यांनी केला असता तर कळलं असतं,” असंही ते म्हणाले आहेत.

“उत्तम इंग्लिश बोलणे, प्रसारमाध्यमांना चांगले बाइट देणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरणं आणि कटिबद्धता…प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.