बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली असून उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावर हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली असून यावेळी प्रथमच आपल्या नाराजीवर जाहीर भाष्य केलं आहे. “आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्यानेच आपण उपमुख्यमंत्रीपद घेतलं,” असा खुलासा सचिन पायलट यांनी केला आहे.

तुम्ही अशोक गेहलोत यांच्यावर नाराज का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी त्यांच्यावर नाराज नाही. मी कोणतीही विशेष मागणी करत नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही बेकायदा उत्खननाविरोधात आवाज उठवला होता ज्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारने वाटप रद्द केलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर अशोक गेहलोत त्याच मार्गावर आहेत. अशोक गेहलोत मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करण्यासाठी जागा आणि मान काहीही देत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझे आदेश न पाळण्यास सांगण्यात आलं आहे. कोणतीही फाइल माझ्याकडे पाठवली जात नाही. गेल्या कित्येक महिन्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. जर मी लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करु शकत नसेल तर हे पद काय कामाचं?”.

…म्हणून मी बंड पुकारलं, सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

“मी हा मुद्दा अनेकदा पक्षासमोर उपस्थित केला. मी राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना याबद्दल सांगितलं होतं. मी अशोक गेहलोत यांच्यासमोरही मांडलं होतं. पण मंत्र्यांच्या कोणत्या बैठकाच होत नसल्याने चर्चा किंवा वाद-विवाद होण्याची काही संधीच नव्हती,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. स्वाभिमान दुखावल्यानेच आपण कार्यकारिणी पक्षाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे.

अशोक गेहलोत यांच्या आरोपांवर बोलताना सचिन पायलट यांनी त्यामध्ये काही सत्यता नसून, राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली असल्याचं सांगितलं आहे. मग मी पक्षाविरोधात काम का करेन ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. आपल्या पुढील वाटचालीवर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. भाजपामध्ये प्रवेश करणार का ? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. मी लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांना सांगितलं आहे. आपण कोणत्याही भाजपा नेत्याची भेट घेतली नसून ज्योतीरादित्य शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांपासून भेटलो नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

भाजपा प्रवेशावर सचिन पायलट यांनी जाहीर केली भूमिका, म्हणतात…

तुमच्यासाठी मुख्यमंत्री होणं इतकं महत्त्वाचं का आहे? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी सांगितलं की, “हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाही आहे. २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता हे खरं आहे. पक्षाच्या फक्त २१ जागा असताना मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. मी लोकांसोबत काम करत असताना पाच वर्षात अशोक गेहलोत यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. पण पक्षाचा विजय होताच अशोक गेहलोत यांनी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. पण त्यांचा अनुभव काय आहे ? १९९९ आणि २००९ असं दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. २००३ आणि २०१३ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जागा ५६ आणि २६ वर आणल्या होत्या. तरीही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आलं”.

“२०१९ लोकसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांनी पक्षाला जास्तीत जागा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांच्या मतदारसंघातही उमेदवार निवडून आणू शकेल नाहीत. हा त्यांचा अनुभव आहे. पण तरीही मी राहुल गांधी यांचा त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय मान्य केला. मी नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्याने उपमुख्यमंत्रीपद घेतलं. राहुल गांधी यांनी कामात आणि सत्तेत योग्य वाटा देण्यास सांगितलं होतं. पण तरीही अशोक गेहलोत यांनी आपला अजेंडा तयार केला आणि माझा अपमान करत लोकांसाठी काम करण्यापासून रोखत राहिले,” असंही सचिन पायलट यांनी  सांगितलं आहे.

राहुल गांधी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “राहुल गांधी आता काँग्रेस अध्यक्षपदी नाहीत. गतवर्षी त्यांनी पद सोडल्यानंतर अशोक गेहलोत आणि त्यांचे सहकारी माझ्याविरोधात एकत्र आले. तेव्हापासून माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी लढा सुरु आहे”. “सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यासोबत माझा काही संपर्क झालेला नाही. प्रियंका गांधी यांच्यासोबत माझं बोलणं झालं. पण ते वैयक्तिक संभाषण होतं,” अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे.

सचिन पायलट यांना त्यांच्या मागण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मला मुख्यमंत्री आणि माझ्या सहकाऱ्यांना मंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी नाही. सन्मानपूर्वक कामाचं वातावरण असावं जेणेकरुन कामाचं समान वाटप होईल अशी माझी मागणी आहे. हा सत्ता, पद किंवा सुविधेचा प्रश्न नाही तर सन्मान आणि काम करण्याचं स्वातंत्र्य मिळण्याबद्दल आहे”.