भारतीय रिझर्व्ह बॅंकेनी आपले पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. रेपो रेट ६.२५ टक्के इतका असणार आहे. तर, आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

या वेळी रेपो रेट वाढणार नाही अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. व्याजदरात बदल करण्यापूर्वी नोटाबंदी आणि महागाई दराच्या वाढीचा काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास केला जाईल असे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले. याआधी रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के होता. यामध्ये वाढ करण्यात आली असून रिव्हर्स रेपो रेट ६ टक्के करण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर दोन महिने चलन तुटवडा होता. नंतर चलन पुरवठा योग्य रित्या होऊ लागला होता. परंतु पुन्हा एकदा रोख रकमेचा तुटवडा जाणवतोय. रिव्हर्स रेट वाढवल्यामुळे बाजारात भांडवल वाढेल तसेच चलन तुटवड्याची तीव्रता भासणार नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील पतधोरणावेळी नोटाबंदीमुळे व्याजदरात बदल करण्यात आला नव्हता. चलनामध्ये पुन्हा नोटा आणण्यासाठी आरबीआयला विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. याला रिमॉनिटायजेशन म्हटले जाते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे.