भारतात लोकसंख्येत निर्माण होणारा असमतोल टाळण्यासाठी हिंदूंनी यापुढे ‘तीन अपत्ये’ होऊ द्यावीत, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंना दिला आहे. येथे सुरू असलेल्या संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत धोरण म्हणून या मुद्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सत्ताधारी संपुआ सरकारची हाकलपट्टी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मतदान होईल असे पहाणे गरजेचे आहे असेही संघआच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी यांनी दिली.भारतात लोकसंख्येत मोठ्ठी स्थित्यंतरे होत आहेत. येथील अल्पसंख्यांची संख्या वाढत असून त्यांना लोकसंख्येत वरचष्मा मिळू नये यासाठी हिंदूंनी यापुढे ‘तीन अपत्यां’चे धोरण अवलंबावे, असे संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सुचविण्यात आले. विकासासाठी समतोल गरजेचा आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी देशातील एकाच विशिष्ट व्यक्तिसमूहावर टाकून चालणार नाही, तर लोकसंख्येचा तोलही सांभाळला जायला हवाच, असे मत या बैठकीत पुढे आले.