देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये एसबीआयने १० हजारांहून अधिक जणांना नारळ दिला आहे. यासोबतच या कालावधीत एसबीआयने कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियाही जवळपास थांबवली आहे.

आठ महिन्यांपूर्वीच एसबीआयमध्ये पाच बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय महिला बँकदेखील एसबीआयमध्ये विलीन करण्यात आली. पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यंदाच्या वर्षातील १ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे या सर्व बँका एसबीआयच्या अंतर्गत आल्या.

विलीनीकरणामुळे एसबीआयच्या देशभरातील शाखांची एकूण संख्या ६ हजार ४८७ ने वाढली. त्यामुळे एसबीआयच्या शाखांची संख्या २३ हजार ४२३ वर जाऊन पोहोचली. मार्च २०१७ मध्ये एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ७९ हजार ८०३ इतकी होती. सप्टेंबरअखेरीस हा आकडा २ लाख ६९ हजार २१९ वर आला आहे. या कालावधीत स्टेट बँकेने केवळ ७९८ कर्मचाऱ्यांची भरती केली.