परमबीर सिंह यांच्या हेतूवर शरद पवार यांची शंका

नवी दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेले ज्येष्ठ  अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या वेळेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आरोपांचा प्रतिवाद केला. ‘‘परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, पण ते बदलीनंतरच का केले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर यांनी आरोपांचे पत्र लिहिले आहे,’’ असे मुद्दे उपस्थित करत पवार यांनी परमबीर यांच्या आरोपांमागील हेतूंबाबत अविश्वास व्यक्त केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला. या पत्राचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, परमबीर यांनी दावा केलेले १०० कोटी नेमके कोणाला मिळाले, त्याचा तपशील त्यांनी पत्रात दिलेला नाही.

परमबीर सिंह यांनी भेट घेतल्याची कबुलीही पवार यांनी दिली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून आपल्याला बाजूला केले गेले तर तो अन्याय ठरेल असे परमबीर यांनी सांगितले होते. शिवाय पोलीस दलाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची तक्रारही परमबीर यांनी केली. मात्र प्रत्यक्ष हप्तेवसुली झाली का वा ते पसे गृहमंत्री किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले का, याबाबत या भेटीत त्यांनी काहीही सांगितले नाही, असेही पवार म्हणाले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या दौऱ्यात फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंच्या राज्य सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात, वाझे यांची पोलीस दलातील फेरनियुक्ती मुख्यमंत्री वा गृहमंत्र्यांनी केलेली नव्हती. १६ वष्रे निलंबित असलेल्या या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पूर्णत: परमबीर सिंह यांचा होता, असा दावा पवार यांनी केला. परमबीर यांनी वाझे यांना पोलीस सेवेत घेऊन त्यांच्याकडे संवेदनशील प्रकरणांच्या तपासाचीही जबाबदारी दिली होती, असे सांगत पवारांनी गृहखात्याच्या कारभाराची अप्रत्यक्ष पाठराखण केली.

परमबीर यांच्या पत्रात दोन प्रमुख मुद्दे असून गृहमंत्र्यांवरील आरोपांशिवाय, दादरा-नगर-हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणाचाही उल्लेख आहे. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली असल्याने त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे होते. गृहमंत्री देशमुख यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश दिला होता. परमबीर सिंह यांनी हे प्रकरण तेथील प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचा सल्ला गृहमंत्र्यांना दिला होता, पण तो गृहमंत्र्यांनी फेटाळला होता. त्याबद्दलही परमबीर गृहमंत्र्यांवर नाराज होते. मात्र गृहमंत्र्यांची कृती योग्य असल्याचा निर्वाळा पवार यांनी दिला.

गृहमंत्र्यांबाबत आज निर्णय?

’राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते तसेच, मुख्यमंत्र्यांशी सोमवारी आपण चर्चा करणार आहोत. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, असे पवार म्हणाले.

’प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही रविवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचीही चर्चा सुरू होती.

’शनिवारी परमबीर यांनी पत्र लिहून देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्याने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीही अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले.

’पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली.

‘सरकार स्थिर’: हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गांभीर्याने हाताळत आहेत. विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यातील सरकारवर आरोप केले जात असले आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असले तरी, महाविकास आघाडी सरकारच्या स्थर्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.

चौकशीचे नेतृत्व करणार नाही : रिबेरो  ‘‘या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व करावे, असे मला सांगण्यात आले तर मी नकार देईन,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केली. माझे वय ९२ वष्रे असून, अशा चौकशांसाठी मी समर्थ नाही. मात्र, समर्थ असतो तरी चौकशीस मी नकार दिला असता,’’ असे रिबेरो म्हणाले.

‘विश्वासार्ह अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी’

परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तसेच अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासातील गोपनीय माहिती उघड होणे हा मुंबई पोलिसांचा गलथानपणा ठरतो. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंसारख्या पोलीस प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाऊ शकते, असे पवार यांनी म्हणाले.