पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. भेटीचं नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याआधी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडला तेव्हाही राहुल गांधी अनुपस्थित होते. दरम्यान अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी ट्विटवर फोटो शेअर करत या भेटीमुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार खूप काम करु शकतं याची माहिती मिळाल्याचं म्हटलं होतं. It was truly a pleasure to interact with @Facebook & @instagram at the HQ in Delhi. There’s so much work governments can do through the power of connectivity and social media. Explored a couple of themes for rural outreach of schemes, education and tourism! pic.twitter.com/0XDEEZlJgI — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 14, 2020 योजना, शिक्षण आणि पर्यटन ग्रामीण भागांपर्यंत पोहोचावं यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.