दक्षिणेतील राजकारण्यांच्या चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पुढे नेत सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली. मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच माझा राजकीय पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल, असे रजनीकांत यांनी जाहीर केले. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आगामी काळात तामिळनाडूतील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात.

चेन्नईच्या श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात त्यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, माझा राजकारणातील प्रवेश ही काळाची गरज होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत स्वतंत्र पक्ष स्थापन करून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यातील लोकशाहीची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशातील इतर राज्यांतील लोक ही परिस्थिती पाहून तामिळनाडूची थट्टा करतात. त्यामुळे मी इतके दिवस राजकारणात का आलो नाही, याची खंत आता मला वाटत आहे. सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली आपले पैसे आणि जमीन बळकावत आहेत. आपल्याला तामिळनाडूतील ही सगळी व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या पक्षाचा मंत्र असेल. आगामी निवडणुकांपर्यंत पक्ष स्थापन करून निवडणूक लढवणे अवघड गोष्ट नाही. तसेच मला जनतेचा १०० टक्के पाठिंबा मिळेल, याची खात्री असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.

९.०९ : तामिळनाडूतील राजकीय यंत्रणा बदलण्याची वेळ आली आहे- रजनीकांत

९.०७ : मी पैशासाठी राजकारणात प्रवेश करत नाही. चाहत्यांनी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मला दिले आहे.

९.०० : मी राजकारणात प्रवेश करतोय- रजनीकांत

८.५७ : रजनीकांत श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात दाखल

८.५० : श्री राघवेंद्र मंडपम् मध्ये पोहोचल्यावर मी महत्त्वाची घोषणा करेन- रजनीकांत