नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं.

करोनावरील लस लवकरच येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी अशी विनंती करत असल्याचं वकील अलख यांनी यावेळी म्हटलं.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल असं न्यायालयाला सांगितलं. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचं नुकसान होणार नाही का ? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल असं म्हटलं.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरील याचिकेवर बोलताना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी करोना संकटात आयुष्य पुढे चालत राहिलं पाहिजे, आपण फक्त परीक्षा थांबवू शकतो का ? आपण पुढे चालत राहिलं पाहिजे असं मत नोंदवलं.