डोकलाम वादावरून गेल्यावर्षी भारत आणि चीन यांच्यात तब्बल ७३ दिवस मोठा तणाव निर्माण झाला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये चीनने नियंत्रण रेषेवर ४१५ वेळा घुसखोरी केली तर २०१६ मध्ये हा आकडा २७१ इतका होता. यात २०१७ मध्ये दोन्ही देशातील सैन्य २१६ वेळा आमने-सामने उभे ठाकले होते. तर २०१६ मध्ये १४६ वेळा समोरासमोर आले होते. भारतीय सैन्यदलाच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार नियंत्रण रेषेवर २३ वेळा दोन्ही देशांमध्ये गंभीर वादाचे प्रसंग घडले. यामध्ये लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरूणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला आणि दिबांग घाट सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

वर्ष २०१६ मध्ये निवृत्त झालेले चीनमधील भारताचे राजदूत अशोक कांता ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले की, घुसखोरांची संख्या महत्वाची नाही. आपल्याला घुसखोरी करण्याची पद्धत समजण्यासाठी संतुलित आकड्यांची आवश्यकता आहे. आपल्याला हे माहीत करून घेतलं पाहिजे की, हे क्षेत्र नेहमीचे वादग्रस्त क्षेत्र आहे की, आणखी नव्या परिसरातून चिनीकडून घुसखोरी होत आहे.

दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आल्यानंतर उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल भाटिया म्हणाले की, घुसखोरीची वाढती संख्या पाहता जमिनी स्तरावरील गस्त वाढवण्याची आम्हाला गरज असल्याचे दिसून येते. भविष्यात आम्हाला याची जास्त गरज असेल. प्रदीर्घ कालावधीपासून अधांतरी राहिलेला भारत-चीन बॉर्डर रस्ता पूर्ण करावा लागेल. आकड्यांनुसार दोन्ही देशांदरम्यान २६ वेळा फ्लॅग मिटिंग झाली आहे.