जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं असंवैधानिक आहे अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारवर टीका करत त्यांनी या संदर्भात आपली पहिलीच प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे झाडले आहेत. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय घटनेचे उल्लंघन आहे असे त्यांनी म्हटले होते. आता प्रियंका गांधी यांनीही याच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. या विषयावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधी या सोनभद्र येथील उभ्मा गावाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनुच्छेद ३७० हटवणं कायद्याला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसने अनुच्छेद ३७० बाबत जी भूमिका घेतली आहे तीच माझी भूमिका आहे. अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी जे संसदेत म्हटलं होतं तेच मलाही योग्य वाटतं आहे असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.