जेम्स बॉण्डच्या ‘गोल्डफिंगर’मध्ये एक संवाद आहे. त्यात बॉण्ड सांगतो, प्रथम जे घडतं ते सहज असतं, दुसऱ्यांदा घडतं तो योगायोगही मानता येईल पण तिसऱ्यांदा जेव्हा तीच गोष्ट घडते तेव्हा तो शत्रूचा कट असतो! याच संवादाची आठवण करून देत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी राज्यसभेत सरकारवर ताशेरे ओढले. आपण लोकशाही जुमानत नाही की कोणत्याही कराराला भीक घालत नाही, हे इटलीने वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुत्सद्दी चांगुलपणा सोडा. त्यांचे हे कृत्य म्हणजे ‘सरकारपुरस्कृत फसवेगिरी’च आहे. आधी १९८० च्या सुमारास एकजण मलेशियामार्गे इटलीला पळाला. त्याला ताब्यात देण्यास इटलीने नकार दिला होता. दुसऱ्यांदा हाच अनुभव आला जेव्हा हेलिकॉप्टर घोटाळ्यातील कागदपत्रे आपण इटलीकडे मागितली आणि त्यांनी ती द्यायला स्पष्ट नकार दिला. आता तिसऱ्यांदा हाच अनुभव येत आहे. तेव्हा हा योगायोग नाही, हा कटच आहे.