दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांबद्दल हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनास्थळी मरण पावलेले शेतकरी घरी असते, तरी मेले असते, असं दलाल यांनी म्हटलं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर दलाल यांनी खुलासा करत सावरासारव करण्याचा प्रयत्न केला.

इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हरयाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शनिवारी भिवानी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. दलाल यांना दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या २०० शेतकऱ्यांबद्दल विचारण्यात आली होती. त्यावर आंदोलनाच्या ठिकाणी मरण पावलेले शेतकरी घरी असते, तरी मेले असते. इथे मरत नाहीत का? मी काय म्हणतो लाख दोन लाखांपैकी सहा महिन्या दोनशे लोक मरत नाहीत का? कुणी ह्रदयविकाराने मेले, कुणी ताप आल्याने मेले,’ असं दलाल म्हणाले. ‘आप’ने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

आणखी वाचा- “जास्त डोकं खराब करू नका…” – राकेश टिकैत यांचा सरकारला जाहीर इशारा

एखाद्या घटनेत दहा लोकांचा मृत्यू झाला, तरी पंतप्रधान दुःख व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं दिसलं नाही. त्यावर दलाल म्हणाले,”हे दुर्घटनेत मरण पावलेले नाहीत, ना स्वतःच्या इच्छेने. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत.” दलाल यांच्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालं. टीकेचे लक्ष्य ठरल्यानंतर दलाल यांनी खुलासा करत सावरासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर टीका होऊ लागल्यानंतर दलाल यांनी खुलासा केला आहे. “माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो. माझं विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्या आलं,” असं म्हणत दलाल यांनी रोष थोपवण्याचा प्रयत्न केला आहे.