उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या टप्पल येथे यात्रेकरूंना घेऊन निघालेली एक खासगी बस उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये ४५ प्रवासी होते. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.

दुर्घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घनटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, अपघातमधील जखमींना तत्काळ योग्य उपचारसुविधा दिल्या जाव्यात असे निर्देश दिले आहेत.

कानपूरहून दिल्लीला निघालेली ही बस अलिगढमधील टप्पल भागात पोहचल्यावर या बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने अपघातामधील जखमींना बाहेर काढले गेले. तसेच, तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.