खांद्यावर कावड घेऊन मात्यापित्यांना देवदर्शनाला घेऊन गेलेल्या श्रावण बाळाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. मात्र पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओदिशातील एका व्यक्तीवर 'श्रावण बाळ' होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओदिशातील आधुनिक 'श्रावण बाळा'चा आटापिटा सुरु आहे. ओदिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावातील कार्तिक सिंह यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. #WATCH: Tribal man in Odisha's Mayurbhanj travels 40 kms on foot carrying his parents seeking justice in an alleged fake case against him. pic.twitter.com/ULn6KGLLba — ANI (@ANI) September 1, 2017 कार्तिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना ग्रामस्थांनी बहिष्कृत केले. 'माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. ग्रामस्थांकडून कोणतेही काम दिले जात नाही. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नोकरीसाठी शहरातही जाऊ शकत नाही,' अशी व्यथा कार्तिक यांनी मांडली. सुनावणीसाठी न्यायालयात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न कार्तिक यांच्यासमोर निर्माण होतो. म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतात. कार्तिक सुशिक्षित आहेत. मात्र ६ ते ७ वर्षांपासून गुन्हा दाखल असल्याने आणि अद्यापदेखील या प्रकरणाचा निकाल न लागल्याने नोकरी न मिळाल्याचे ते सांगतात. याच कारणामुळे त्यांचे लग्नदेखील झालेले नाही. ओदिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात असे अनेकजण असल्याचे वकील प्रभूदान मरांडी सांगतात. 'कार्तिक यांच्या आयुष्यात घडलेली घटना याआधीही अनेकांसोबत घडली आहे. अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत,' असे मरांडी यांनी सांगितले. 'मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या या खोट्या गुन्ह्याची शिक्षा अनेक निष्पाप व्यक्तींना भोगावी लागली,' असेदेखील त्यांनी पुढे बोलताना सांगितले.