आई-वडिलांसोबत बस पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका सहा वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्देवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात इटावाह-मैनपुरी सीमेवर किश्नी भागात मंगळवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. गुरुग्रामवरुन हे कुटुंब सीतापूर जिल्ह्यामध्ये चालले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तेरा स्थलांतरित मजुरांसोबत हे कुटुंब एका ट्रकमध्ये बसले होते. ट्रकमधून उतरल्यानंतर त्यांना मैनपुरी सीमेवर थांबलेल्या एका बसमध्ये बसण्यास सांगण्यात आले. त्यावेळी हा दुर्देवी अपघात घडला. मृत मुलीचे पालक आणि काही नातेवाईक सोमवारी गुरुग्रामवरुन चालत निघाले होते. त्यानंतर त्यांना एका ट्रकमध्ये लिफ्ट मिळाली. मंगळवारी सकाळी इटावाह-मैनपुरी सीमेवर पोलिसांनी ट्रकला अडवले.

“बस पकडण्यासाठी आम्ही आमचे सामान घेऊन ट्रकमधून उतरत होतो, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने माझ्या मुलीला चिरडले” असे तिच्या वडिलांनी सांगितले. मैनपुरी प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्यानंतर ते आता मुलीचा मृतदेह घेऊन गावी जात आहेत. ‘आम्ही ट्रक आमच्या ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरुन ट्रक चालक पळून गेला. लवकरच त्याला अटक करु’ असे मैनपुरीचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले.

मृत मुलीचे वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करतात. “होळी झाल्यानंतर आम्ही १५ मार्चला गुरुग्रामला परत आलो. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे काम मिळत नव्हते. रोजच्या उत्पन्नावर आमचे घर चालते. गुरुग्राम रोजचा दिवस ढकलणे कठिण बनले होते. त्यामुळे आम्ही सीतापूरला आमच्या मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला. घरी जाण्याचा आमचा उत्साह दु:खामध्ये बदलला” असे मुलीच्या वडिलांनी सांगितले