अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. रामललाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. हे मंदिर अत्यंत सहजपणे उभे राहत नाहीय. त्यासाठी राम भक्तांनी शेकडो वर्ष संघर्ष केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहावे, यासाठी पडद्यामागे अनेकांनी हातभार लावला आहे. समाजात अशा काही व्यक्ती आहेत, ज्या कधीही माध्यमांसमोर आल्या नाहीत, पण पडद्यामागे राहून त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी साधना केली आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. अयोध्येतील राम मंदिरासाठी उर्मिला चतुर्वेदींची तपस्या पाहून तुम्हाला शबरीची आठवण येईल. राम मंदिरासाठी उर्मिला यांनी गेल्या २८ वर्षांपासून उपवास ठेवला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी उर्मिला यांनी राम मंदिराचे निर्माण होत नाही, तो पर्यंत अन्नगहण करणार नाही असा संकल्प केला. उर्मिला चतुर्वेदी यांचे वय तेव्हा ५४ वर्ष होते. न्यूज १८ हिंदीने हे वृत्त दिले आहे.

गेल्या २८ वर्षात उर्मिला यांनी राम नामाचा जप करताना अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. फक्त त्या फळांचे सेवन करुन साधनेमध्ये व्यस्त असतात. उद्या पाच ऑगस्टला २८ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजनाने त्यांचा संकल्प सिद्धीस जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून उर्मिला प्रचंड आनंदात आहेत. अयोध्येत रामललाच्या दर्शनानंतर शरयू नदीच्या किनाऱ्यावर २८ वर्षांपासून सुरु असलेला उपवास आपण सोडणार आहोत असे उर्मिला चतुर्वेदी यांनी सांगितले.

भूमिपूजनाच्या दिवशी करणार राम नामाचा जप
उद्या पंतप्रधान मोदी जेव्हा अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन करतील, त्यावेळी उर्मिला दिवसभर आपल्याघरी राम नापाचा जप करतील. उर्मिला यांची अयोध्येमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. पण करोना संक्रमणाचा धोका आणि डॉक्टरच्या परवानगीनंतरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त उर्मिलाच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्वचजण आज आनंदात आहेत.